समाजातील उत्कृष्टतेची प्रेरणादायी बांधिलकी

समाजातील उत्कृष्टतेची प्रेरणादायी बांधिलकी

.

.

उत्कृष्टतेची बांधिलकी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पण केलेल्या प्रेरणादायी नेत्याचा स्मृती सोहळा

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी पाच दशकांहून अधिक काळ शिक्षण, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, सिंचन, आरोग्य, क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देऊन महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कृतिशील वारसा त्यांनी पुढे चालविला, जो आपल्या सर्वांसाठी अविरत ऊर्जा देणारा आहे. अखंड कार्यमग्नता आणि प्रचंड सकारात्मकता हा डॉ. पतंगराव कदम साहेबांचा गुणविशेष आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी वेचले. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. सर्वसामान्य माणसांत देव पाहून त्यांनी निरलस भावनेने जनसेवा केली. पलूस, कडेगाव हा भाग एकेकाळी दुष्काळी भाग होता. त्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांचा संसार फुलवायचा असेल तर पाण्याची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी टाकळीचे धरण, टेंभू, ताकारी योजना व इतर सिंचन योजना मार्गी लावून या दुष्काळी तालुक्यांत पाणी आणून या परिसराचे नंदनवन केले. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी त्यांनी जिद्दीने काम केले आणि पिण्याचे पाणी व सिंचनाच्या सुविधा या भागात उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. डॉ. पतंगराव कदम साहेबांचे असणे हीच एक प्रचंड ऊर्जा होती. त्यांनी केवळ संस्थाच उभ्या केल्या नाहीत तर प्रचंड मेहनत करून त्या नावारूपाला आणल्या. त्यांनी अनेक माणसे घडवली. कार्यकर्ते घडवले. त्यांच्या मनात सकारात्मक कार्याचे बीज पेरले. प्रोत्साहन दिले. प्रत्येक कार्यकर्त्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली. त्यांचे ‘लोकतीर्थ’ स्मारक पुढील पिढीला नक्कीच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल.

कार्यक्रम दिनांक व वेळ

गुरूवार, दि : ५ सप्टेंबर २०२४
वेळ : सकाळी १०.०० वाजता
स्थळ : भारती विद्यापीठ, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगांव, ता. कडेगांव, जि. सांगली

Live कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हा!

सहकाराचे मर्म जपत गतिमान शिक्षणातून
समाजपरिवर्तन करणारे साहेबांचे विचार...

मी लहान असतांना गावात फिरत असे. अनेकांच्या चुली पेटायच्याच नाहीत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. माझी आई लोकांना पायलीनं ज्वारी देण्याचं काम करायची. मी तिच्याकडं बघत बसत असे. माझ्यात जी सामाजिक जाणीव दिसते, त्याचं बीजारोपण आईच्या त्या वेळच्या व्यवहारात आहे. आयुष्यभर भारती विद्यापीठासाठी लढत राहिलो. या धामधुमीत घस्च्यांसाठी - मुलाबाळांसाठी काहीही केलं नाही. माझ्या पत्नीनेच घर चालविले. मुलांचे शिक्षण तिनेच केले. आज भारती विद्यापीठाच्या भव्य इमारती सगळ्यांना दिसतात; परंतु त्यामागे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. यापुढचा काळ सोपा नाही. शिक्षणावर काळाची नजर असेल. कोणीच गाफील राहू नये. आपण नवीन काय करती? जे करतोय ते समाजापर्यंत पोहोचतंय का? वेगळं काय करतो? या प्रश्नांना सगळ्यांनाच सामोरे जावे लागेल. भारती विद्यापीठात आज किती मेंदू आहेत? तीच आपली संपत्ती. सगळ्यांनी डोकं चालवलं तर जगाला धक्का देता येईल.

पुण्यात जेव्हा मी आलो, तेव्हा माझी परिस्थिती बिकट होती. रिक्षाला द्यायला पैसे नसायचे; परंतु प्रबळ प्रेरणा होत्या. सांगली, सातारा जिल्ह्यांचा संस्कार होता. जबरदस्त इच्छाशक्ती होती. संस्था काढायची तर पुण्यातच काढायची, असे मनात होते. पुणे जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनानेही माझ्या संस्कारात नवी भर घातली. हडपसरला साधना विद्यालयात सायन्सच्या प्रयोगशाळेत मी टेबलावर झोपत असे. जेवायला पैसे नसायचे. गाडीतळावर एक खानावळवाला होता, तो मला मास्तर म्हणायचा. त्याचं माझं गणित जमलं. तो म्हणायचा, "जेवणाचे पैसे आत्ता देऊ नका. नोकरी लागल्यावर द्या." आयुष्यात मी एक गोष्ट सांभाळली. ज्यानं मला चिमूटभर मदत केली, त्याला आपण भाराभर द्यायचं. या खानावळवाल्याचं नंतर मी कल्याण केलं.

साहेबांची राजकीय वाटचाल

१९८५

भिलवडी - वांगी मतदारसंघातून प्रथमच आमदार म्हणून निवड.

१९९०

भिलवडी - वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड; प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले.

१९९२

शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री.

१९९९ - २००४

उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री.

नोव्हेंबर २००४

सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री.

मार्च २००९

अशोक चव्हाण मंत्रिमंडळात वनमंत्री.

१९ नोव्हेंबर २०१०

वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा.

साहेबांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय...

साहेबांना मिळालेले पुरस्कार...

अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार

२०१६, अमृतवाणी शेती आणि शिक्षण विकास संस्था , संगमनेर.

अ‍ॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार

२०१६, महाराष्ट्र साहित्य कला आणि प्रसारिणी सभा, पुणे.

शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान

विपणन आणि व्यवस्थापन संस्था नवी दिल्ली (पुणे विभाग).

लोकश्री

अर्थशास्त्रीय संस्था,नवी दिल्ली, सामाजिक आणि शैक्षणिक विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी पारितोषिक.

डॉ. पतंगराव कदम साहेब विविध मान्यवरांसोबत...

स्मरण ध्यासपर्वाचे

गौरवगाथा...

आठवणीतले साहेब...

"केवळ महाराष्ट्रातील जनतेसाठी नव्हे तर देशभरातील लोकांसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणक्षेत्राच्या माध्यमातून जे योगदान दिले, ते अतुलनीय आहे"
मा. इंदिराजी गांधी
माजी पंतप्रधान
"पतंगरावांचे व माझे जन्मगाव हे सोनहिरा खोऱ्यातले. सोनसळच्या या शेतकऱ्याच्या पोराने पुण्यासारख्या शहरात भारती विद्यापीठाची स्थापना करून चमत्कारच घडविला. ज्ञान व अर्थ याचा साधलेला सुंदर समन्वय म्हणजे भारती विद्यापीठ"
मा. यशवंतराव चव्हाण
माजी मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान
"डॉ. पतंगराव कदम हे स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाच्या गतिमान शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाकडे वाटचाल करण्याच्या कार्याला धन्यवाद"
मा. डॉ. पी. व्ही. नरसिंहराव
माजी पंतप्रधान
"भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचा आणि माझा बराच दीर्घकाळाचा संबंध आहे. अवघ्या काही दशकांमध्ये विविध ज्ञानशाखांचे व्यापक जाळे निर्माण करून समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हे किती प्रभावी साधन आहे, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे"
मा. डॉ. प्रणव मुखर्जी
माजी राष्ट्रपती
"एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पतंगराव कदम यांची वाटचाल आणि त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून जे रचनात्मक काम देशासाठी उभे केले आहे, ते पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे"
मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
माजी राष्ट्रपती
"भारती विद्यापीठ हे पतंगराव कदम यांचे स्वप्न आहे. आणि ते एकाग्रपणे, समर्पण भावनेने आणि निष्ठापूर्वक जोपासले गेले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत आपल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचाराने भारती विद्यापीठाने एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे"
मा. डॉ. प्रतिभाताई पाटील
माजी राष्ट्रपती
"पतंगरावांची इच्छाशक्तीच जबरदस्त आणि विलक्षण मेहनतवादी असल्याने त्यांना इच्छापूर्तीचे वरदान लाभले आहे"
मा. वसंतरावदादा पाटील
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
"भारती विद्यापीठाने डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कमी कालावधीत अध्यापन, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत फार मोठी झेप घेतली आहे"
मा. खासदार श्रीमती सोनियाजी गांधी
माजी अध्यक्षा, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
"पतंगरावांचे वैशिष्ट्य असे की, कोणत्याही कार्यात ते वेगळेपण निर्माण करतात. त्यात नेमकेपणा असतो, दृष्टी असते आणि विचार असतो"
मा. खासदार शरदचंद्र पवार
ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री

स्मरणगंध साहेबांचा...

साहेब, तुमच्या स्पर्शानं इथल्या माणसाचं जगणं अमृतासारखं मधाळलेलं,
तुम्ही तुमचं आयुष्य आमच्यासाठी गुलालासारखं उधळलेलं…
साहेब, शब्द तुमचा पाठीवर थाप अंगावर शहारे उठायचे अमावस्येच्या अंधाराला पौर्णिमेचे लख्ख चांदणे फुटायचे…
चेहऱ्यावर हास्यरेषा, जगण्यात धडाडी, मनात तुमच्या जिद्द भरलेली कोसळणारी वीज सुद्धा तुम्ही मुठीमध्ये धरलेली…
पुंडलिकासम तुमची मातृभक्ती ज्ञानाचि रचिली वीट उजळूनि गेल्या दश दिशा उभे राहिले संस्काराचे भारती विद्यापीठ…
साहेब, तुमचं कर्तृत्व समुद्रातल्या लाटेसारखं भरारी देणारं अडखळणाऱ्या पावलांनाही बोट धरून पुढे नेणारं…
आम्ही नाही पाहिलं सोनं नाणं, आम्ही माणसं पाहिली साहेब तुमच्यासारखी घडलेली, मातीमध्ये राहूनसुद्धा आभाळाला भिडलेली…
साहेब, रितं रितं वाटतं जगणं जसा मूर्तीविना गाभारा आठवण येते क्षणोक्षणी डोळ्यांतून पाझरतात अश्रुधारा…
आवरता येत नाही दुःख तुम्ही नसल्याचं, नियतीपुढं माणूस आहे दुबळाच ठरलेला
साहेब, तुमच्या नावाचा सूर्य आम्ही आमच्या काळजावर कोरलेला.

लेखक -प्रा. संतोष काळे, पलूस

प्रेरणादायी जीवनप्रवास

Scroll to Top